उद्धव ठाकरे तुम्हाला सुमंत रुईकर आठवतोय का? संजय राऊत यांच्या रेड्याच्या टीकेवर भाजपचं उत्तर

राज्यात यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार झालेत अशी टीका खासदार राऊत यांनी केलीय. नक्षली हल्ले, नांदेड मृत्यूप्रकरणांबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आता भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे.   

राजीव कासले | Updated: Oct 6, 2023, 12:57 PM IST
 उद्धव ठाकरे तुम्हाला सुमंत रुईकर आठवतोय का? संजय राऊत यांच्या रेड्याच्या टीकेवर भाजपचं उत्तर title=

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. गेल्या काही दिवसात ठाणे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात  महाराष्ट्रात 100 हून अधिक मृत्यू झालेयत. यावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय. त्यावर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत. महाराष्ट्रात 100 हून अधिक मृत्यू झालेयत पण मुख्यमंत्र्यांना त्याचे दु:ख नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलय.  कोरोना काळात घराघरात चुली बंद होत्या. लहान मुले, ज्येष्ठांना रोज अन्न पुरवठा करत होतो. तेव्हा हे घरात लपून बसले होते. ज्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत, अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर काय अपेक्षा करणार? अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपचं उत्तर 
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता भाजपनेही (BJP) सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे  त्यात म्हटलंय 'महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, असे @rautsanjay61 आज म्हणाले. राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही, हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे.. पण आज तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले. कधी तुमच्या मालकाला विचारा. त्यांना बीडचा सुमंत रुईकर आठवतो का?तो आठवा!! म्हणजे तुमचे आजचे वाक्य तुमच्याच कानफटात कसे वाजते त्याचा आवाज आठवा'

'सुमंत आठवला की त्याचा अकाली मृत्यू आठवा, त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही वाऱ्यावर सोडलेले त्याचे कुटुंब आठवा...त्यांची पत्नी कीर्ती काय म्हणाली तेही आठवा. सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा.. आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा. तुमचे मालक 
@OfficeofUT यांची मणक्याची शस्त्रक्रिया नीट होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, मी बीड ते तिरूपती पायी चालत दर्शनाला येईन असे साकडे बालाजीला सुमंत रुईकरने घातले होते. उध्दव ठाकरे ठणठणीत झाल्यावर आपले वचन पूर्ण करण्यासाठी बीडहून 1100 किमी पायी निघालेल्या सुमंतचा कर्नाटकात मृत्यु झाला...

आणि, त्यानंतर तुम्ही आणि तुमचे मालक सुमंतला विसरले. त्यांची पत्नी कीर्ती म्हणाली, ज्या ठाकरेंच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी तिच्या नवऱ्याने जीव दिला. त्याच्या मृत्युनंतर दहा दिवसांत ठाकरे कुटुंबातील कोणीही सुमंतच्या परिवाराशी संपर्क केला नाही. त्यानंतरही दीड वर्षे ठाकरे कुटुंबातील कुणीच बोलले नाही, भेटले नाहीत. साधी विचारपूसही केली नाही.. माझ्या नवऱ्याचे बलिदान व्यर्थ गेले..!!!

लक्षात आले का राऊत रेडा कोण घेवून फिरते?  पक्ष नावाचे कुटुंब वाऱ्यावर सोडून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी...' इतकेच तुम्हांला आणि तुमच्या मालकाला ठावूक आहे. सद्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांचे कर्तुत्व तुम्ही विरसलेच आहात. या पंधरवड्यात त्यांचे स्मरण करा. कशाला यमाचे नाव काढता?

आशिष शेलार यांनीही साधला निशाना
तर भाजप नेते आशिष शेलार यांनीही भाई रुको जरा.. सब्र करो..!" म्हणत ठाकरे गटावर टीका केली आहे.  'मुंबईतील नालेसफाई, रस्ते, डांबर, बेस्ट बस, पालिका शाळेतील मुलांच्या वह्या, कपडे आणि कोविडमध्ये बॉडी बॅग अशा प्रत्येक कंत्राटातील "कटकमिशन"चा हिशेब कंत्राटदारांकडून घ्यायची सवय ज्यांना वर्षानुवर्षे लागली होती. त्यांनी आता.. पेग्विन सारख्या मुक्या पक्षांचा पण हिशेब मारायला सुरुवात केली आहे. पेग्विन मुळे 50 खोके मिळाले आणि चित्यांमुळे किती?

भाई रुको जरा.. सब्र करो..!"
तुम्ही पेग्विन आणताना, त्यांचे खास घर बांधताना, देखभाल करताना, कंत्राटदारांकडून किती कटकमिशन घेतले? याचा हिशेब पण द्या ना आधी.

आता चित्यांचा हिशेब मागताय काय? तुमच्या खासदार, आमदार, नगरसेवकांनी तुमचा हिशेब केलाच आहे ना? चला आता बाकी उरलासुरला तुमचा "हिशेब" मुंबईकर निवडणुकीत चोख करतीलच! असं शेलार यांनी म्हटलंय.