आज कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्यातील अडीच कोटींहून अधिक जणांना पहिला डोस

गेल्या 24 तासांत 393 रुग्णांचा मृत्यू

Updated: Jun 10, 2021, 10:26 PM IST
आज कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्यातील अडीच कोटींहून अधिक जणांना पहिला डोस title=

मुंबई : गुरुवारी राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये काहीशी वाढ झाली. दिवसभरात राज्यात 12,207 नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर गेल्या 24 तासांत 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 11,449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.45 टक्के इतकं आहे. 

राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखलं आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. 

राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केलं आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.