महाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  

Updated: Oct 16, 2020, 01:23 PM IST
महाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांला चांगलेच फटकारले. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असे विचारात खडेबोल सुनावले.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नसल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

सोबतच महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, अशी विचारणाही सरन्यायाधीशांनी केली. दरम्यान राष्ट्रपतींकडे ही मागणी करण्याचे स्वातंत्र्य असल्याची कोपरखळीही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला या निमित्ताने लगावली. याचिकाकर्त्यांने केवळ मुंबईमधील घटनांचा उल्लेख करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली होती. त्यावर "महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून सर्व महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल, असा सवाल करत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले.