एसटी संपाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट, उद्या सकाळपर्यंत वाट पाहणार...

Anil Parab on ST employees strike :सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. लेखाजोखा मांडला आहे. उद्या सकाळपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यानंतर कारवाई अटळ आहे, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

Updated: Nov 25, 2021, 02:04 PM IST
एसटी संपाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट, उद्या सकाळपर्यंत वाट पाहणार... title=
संग्रहित छाया

मुंबई :  Anil Parab on ST employees strike : दोन दिवसात कामावर रुजू व्हा अन्यथा बडतर्फीची कारवाई सुरु करणार आहोत, असे एसटी प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांना बजावण्यात आले आहे. दोन दिवसांचा अल्टीमेटम एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. लेखाजोखा मांडला आहे. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहणार आहोत, त्यानंतर कारवाई अटळ आहे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी संपकऱ्यांना दिला आहे.

राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. तुमच्या ज्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आता मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की पुढं कसं जायचं ते. संप मागे घेवून कामावर रूजू व्हावे. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आता अनिल परब यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचे ऐकावे. तुटेपर्यंत तुटू नये, नंतर जोडता नाही येणार. जर काही राहिले असेल तर समितीसमोर मांडा. संप करून जनतेला वेठीला धरू नका. माझा संबंध कामगारांशी आहे, त्यांची लिडरशीप कुणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे, यावेळी अनिल परब म्हणाले. 

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळाकर यांनी यांनी दिली. आझाद मैदानातलं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहे. पुढील निर्णय हा कामगारांनी घ्यायचा आहे. पगारवाढ हा कामगार लढ्याचा ऐतिहासिक निर्णय आहे. सरकार एक पाऊल मागे आले आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. दरम्यान, खोत, पडळकरांना आंदोलनातून आझाद केले आहे, गुणरत्न सदावर्ते म्हणाले. खोत, पडळकरांची स्थगिती स्वतःपुरती आहे, असेही सदावर्ते म्हणाले.