अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला - संजय राऊत

संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका

Updated: Nov 23, 2019, 12:28 PM IST
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला - संजय राऊत title=

मुंबई : अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. पण आमच्या नजरेला नजर लावून बोलत नव्हते. नंतर ते अचानक गायब झाले. हे आमच्या लक्षात आलं होतं. त्यांचा फोन नंतर बंद होता. ते वकिलाकडे बसले होते असं कळत होतं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते हे आता कळालं. शरद पवारांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही हे मी सांगू शकतो. शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण बदललं. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला आहे. जनता याला उत्तर देईल. अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

'अजित पवार यांची जागा आर्थर रोड जेलमध्ये असं भाजप म्हणत होतं. आता कॅबिनेटच्या बैठका आर्थर रोडमध्ये होईल का? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक होईल. पवारांना या वयात घरातूनच दगा दिला गेला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी गोष्टी घडत असतान हे असं घडलं. काळोखातील पाप काळोखातच नष्ट होतं. भाजपने राजभवनचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर केला आहे.'

'अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा फासली आहे. त्यांना जनता माफ करणार नाही. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी एक ट्विट देखील केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी नाव न घेता टीका केली आहे.