'सामना'तला 'माणसांना मारणारे कसाई' हा उल्लेख कोणासाठी?

'येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे कसाई राज्य करतात'

Updated: Jul 20, 2018, 08:20 AM IST
'सामना'तला 'माणसांना मारणारे कसाई' हा उल्लेख कोणासाठी? title=

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'चा अग्रलेख पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलाय. मोदी सरकारविरुद्ध विरोधकांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मत मांडताना 'बहुमताची झुंडशाही' या मथळ्याखाली मुखपत्राचा अग्रलेख छापण्यात आलाय. गुरुवारी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना 'टेन्शन घेऊ नका' असं म्हणत आपण सरकारसोबतच राहणार असल्याचं आश्वासन देणाऱ्या शिवसेनेनं आज मात्र 'प्रचंड पैसा, सत्तेची दडपशाही आणि मतदान यंत्राची हेराफेरी हीच विजयाची त्रिसूत्री' असल्याचं म्हणत भाजपवर टीका केलीय. इतकंच नाही तर, 'येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे ‘कसाई’ राज्य करतात' असं वादग्रस्त वक्तव्यही या अग्रलेखात करण्यात आलंय. यातला 'माणसांना मारणारे कसाई' हा उल्लेख कुणासाठी करण्यात आलाय? असा प्रश्न लोकांना पडलाय. 

काय म्हटलंय 'सामना'च्या अग्रलेखात 

नव्याने सुरू झाले. पण ‘बुंद से गयी वो हौद से नही आती.’ खरे म्हणजे ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या विकृतीने केलेले राज्य लोकांच्या अविश्वासाला पात्र ठरले आहे. प्रश्न कश्मीरचा असेल नाही तर जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवण्याचा, महागाईचा असेल नाही तर आमच्या नाणार प्रकल्पग्रस्तांचा, सर्व स्तरांवर जनतेच्या पाठीत फक्त खंजीरच खुपसले गेले. सत्य बोलणे हा देशद्रोह ठरतो, पण विश्वासघात करणे, जनतेला गंडवणे हा शिष्टाचार ठरत आहे. जगात आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो. ठीक आहे, पण त्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने आमच्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारातून सोडवलेले नाही. त्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने कश्मीरातील शेकडो जवानांचे हौतात्म्य रोखलेले नाही. नाणारमधील रिफायनरीचे गॅस चेंबर रोखा असे ओरडून सांगणाऱ्या जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू. ज्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत गरीबांना, बेरोजगारांना स्थान नाही ती अर्थव्यवस्था काय कामाची! येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे ‘कसाई’ राज्य करतात. सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे! 

सगळा कारभार माणुसकीशून्य... माणसांना मारणारे कसाई... अशी मोदी सरकारवर जहरी टीका करणाऱ्या शिवसेनेनं विश्वासदर्शक ठरावात सरकारला पाठिंबा करण्याचा निर्णय का घेतलाय? असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.