'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

राजीव कासले | Updated: Aug 31, 2023, 05:57 PM IST
'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल title=

INDIA Alliance Meeting Mumbai : इंडिया आघाडीची (I.N.D.I.A) दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे.  मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत.  या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) मुंबईत दाखल झालेत. राहुल आणि सोनियांचं एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत झालं. राहुल गांधींचं अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यासह इतर नेत्यांनी एअरपोर्टवर स्वागत केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांची स्वागताला मोठी गर्दी झाली होती. राहुल गांधींनी अभिवादन करुन स्वागत स्वीकारलं आणि ग्रँड हयातमध्ये पोहोचले. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

अदानी मोदींच्या इतके जवळ कसे
मुंबईत होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा अदानी बॉम्ब फोडला.. उद्योगपती गौतम अदानींच्या (Gautam Adani) कंपन्यांच्या कथित घोटाळ्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचं नेमकं काय नातं आहे? असा सवाल त्यांनी केला. अदानींच्या कथित शेअर घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली... ईडी आणि सीबीआय अदानींची चौकशी का करत नाही, असा सवालही गांधींनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. हिंडनबर्गनंतर आणखी एका संस्थेने अदानी समुहावर आरोप केले आहेत. ऑर्गेनाइज्ड क्राइम एंड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) एका अहवालात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

पुरावे देऊही सेबीने गौतम अदानी यांना क्लीन चीट दिली. दोन जागतिक वृत्तपत्रांनीही हा प्रश्न मांडला असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत याचे पुरावे दाखवले. भारतातला पैसा फिरवला गेला आणि पुन्हा भारतात आणण्यात आला. हा पैसा कुणाचा आहे, अदानींचा की आणखी कुणाचा? हे मोदी यांनी स्पष्ट करावं असं आवाहन राहुल गांधी यांनी केली. देशातील काही उद्योगपतींच्या कुटुंबियांशी संबंध आहेत. त्यातून पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली  असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक आहे, सर्वांना समान संधी आहेत. मग पंतप्रधान मोदी असे का? पंतप्रधान जेपीसीची मागणी का मान्य करत नाहीत, तपास का टाळत आहेत? पंतप्रधानांच्या जवळच्या अदानींना आपल्या अर्थव्यवस्थेत फायदे का दिले जात आहेत? असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. अदानीच्या नेटवर्कद्वारे 1 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले आणि नंतर परत आले.  आता त्यांना धारावीचा प्रकल्पही मिळाला आहे. हा पैसा कोणाचा गुंतवला जात आहे? अदानीच्या भावासह 2 परदेशी व्यक्ती शेअर बाजारावर परिणाम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

गौतम अदानींच्या भावाचा या प्रकरणाशी काय संबंध असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हे काम करण्यामागे मास्टरमाईड विनोद अदानी आहेत. विनोद अदानी हे गौतम अदानी यांचे भाऊ आहेत. याशिवाय आणखी दोन बिझनेस पार्टनर आहेत, यापैकी एकाचं नाव नासिर अली शबान अली आणि दुसऱ्याचं नाव आहे, चँग चुंग ली हा चीनचा व्यक्ती आहे. यांची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.