‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर, 'उद्या' या कांदबरीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

प्रसिद्ध लेखक नंदा खरे (Nanda Khare ) यांच्या 'उद्या' या  कांदबरीला 2020 साठीचा तर बाल साहित्यिक आबा महाजन (Aba Mahajan) लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 

Updated: Mar 13, 2021, 06:59 AM IST
‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर, 'उद्या' या  कांदबरीला  सर्वोत्कृष्ट पुरस्कार   title=

मुंबई : प्रसिद्ध लेखक नंदा खरे (Nanda Khare ) यांच्या 'उद्या' या  कांदबरीला 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार (Sahitya Akademi Award 2020 ) जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध बाल साहित्यिक आबा महाजन (Aba Mahajan) लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर (Bal Sahitya Puraskar) झाला आहे. या दोन्ही पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  नंदा खरे आणि आबा महाजन या मराठी साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.

 ‘उद्या’ कादंबरीस मानाचा पुरस्कार

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित  ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2020  ची  आज घोषणा झाली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 20 भाषांकरिता ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तसेच २१ लेखकांना ‘बाल साहित्य पुरस्कार’ तर 18 भाषांकरिता ‘युवा पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

साहित्य अकादमीने२० प्रादेशिक भाषांतील सात कविता संग्रह, चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह ,दोन नाटके, एक संस्मरण आणि एक महाकाव्य या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात मराठी भाषेसाठी प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

‘उद्या’ कांदबरीविषयी...

‘उद्या’ हा मागील तीनशे वर्षांपासूनचा लेखकाच्या मनातील सल आहे. लेखकाने कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमानाचा वेध घेत या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट सादर केला आहे. या कादंबरीत  सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर सहजगत्या प्रकाश टाकला आहे. सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी हा अभिव्यक्ती आणि वर्तन विश्लेषक आहे. सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या  प्रमुख नेत्याचा लेखनिक आहे. या प्रकारे कादंबरीतील सर्व पात्रांना या कादंबरीत उत्तमरित्या न्याय देण्यात आला आहे. 

मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता.  मल्याळम, नेपाळी, उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत. तसेच ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी  विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

दरम्यान, साहित्यविश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'साहित्य अकादमी' पुरस्कार नंदा खरे यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय सविनय जाहीर केला आहे, त्यांच्या निर्णयाबद्दल आदर व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य वीस भाषांमधील साहित्यिकांचेही अभिनंदन केले आहे.

 युवा पुरस्काराची लवकरच घोषणा

साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या युवा पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली.  एकूण १८ प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.