मुंबई पोलीस सक्षम, महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचे काम - संजय राऊत

महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहेत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू -  खासदार संजय राऊत  

Updated: Aug 12, 2020, 01:38 PM IST
मुंबई पोलीस सक्षम, महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचे काम - संजय राऊत  title=

मुंबई : महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहेत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू, राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. तसेच मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत, तेच हे हा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन, त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सूचली असेल तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, या प्रकरणाला न्याय मिळो, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. 

राज्य सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होत असेल तर मग केंद्रातलं सरकार पडेल. अशावेळी राजकारण केलं जातंय. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे. पार्थ पवार यांची भूमिका वेगळी नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिले. 

राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्याच सगळं हे वाहून गेलंय. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत. त्यात हे सरकार पाडणं, अस्थिर करणं याच रस आहे त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या शेकत राहावं. आम्हाला खूप काम आहे, आम्हाला ५०, १०० नोटीस येत राहतात. बाकी काही मला माहिती नाहीये. मला काहीच माहिती नाही, असे ते म्हणाले. 

मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचा परिवार त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करत आहेत. काय करायंचंय ते आम्ही आणि त्यांचा परिवार पाहू मीडीयाने काही बोलायचं काही काम नाही, असे सांगत ते मीडियावर घसरलेत.