रात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 8, 2024, 04:19 PM IST
रात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा  title=
mumbai local news women passengers feel scared in train after 11 pm

Mumbai Local News Update:  मुंबई महिलांसाठी सुरक्षित मानली जाते. मुंबईच्या रस्त्यांवर रात्री 12 नंतरही महिला एकट्या फिरु शकतात. मात्र, मुंबई लोकलबाबत हा अंदाज हल्ली खोटा ठरायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. अलीकडेच रेल्वेने केलेल्या एका सर्वेक्षणातून महिलांना रात्री 11 नंतर ट्रेनमधून फिरण्याची भीती वाटत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयाकडून महिलांना लोकलमध्ये जाणवणाऱ्या समस्या, तक्रारी आणि अनुभव जाणून घेण्यासाठी एख सर्वेक्षण करण्यात आले होते. यात सर्वेक्षणात जवळपास 3 हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता. 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत ऑनलाइन माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. यात 21 प्रश्न महिलांना विचारण्यात आले. 

जीआरपी सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले, ते पुढीलप्रमाणे, लोकल ट्रेनमधून किती वेळा प्रवास करतात? त्यांचा रुट काय आहे? त्यांच्याकडे सीझन तिकिट आहे की पास आहे? ते ट्रॅव्हल का व किती वाजता करतात? त्यांना कोणत्या वेळी प्रवास करणे सुरक्षित वाटते? ट्रेनच्या ऐवजी प्लॅटफॉर्मवर त्यांना सुरक्षित वाटते का? पोलिस युनिफॉर्ममध्ये असावेत का? असे प्रश्न महिला प्रवाशांना विचारण्यात आले आहेत. त्यांनीही उत्तरे देत तिकिट चेकिंग वाढवण्यासाठी, लोकल सेवा वाढवण्यासाठी तसंच, महिलांचा डब्बा वाढवण्यासाठी व रात्रीच्या वेळी महिला डब्यात युनिफॉर्म असलेले सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावे तसंच, पुरुष फेरीवाल्यांना महिलांच्या डब्यात न घुसू न देण्याची मागणी केली आहे. 

सर्वेक्षणात महिलांनी काय उत्तरे दिली?

जीआरपी ऑफिसकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 40 टक्के महिलांनी म्हटलं आहे की, रात्री 11 वाजल्यानंतर त्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास भीती वाटते. तर, 28 टक्के महिलांनी रात्री 10 वाजल्यानंतर प्रवासादरम्यान सुरक्षेची मागणी केली आगे. सर्वेक्षणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा घडल्यानंतक फक्त 29 टक्के महिलांच गुन्ह्याची नोंद करतात. तर 64 टक्के महिला गुन्हा दाखल करण्यास घाबरतात. तर, 12 टक्के महिला लैंगिक अत्याचार झाल्यानंतरही लोकलज्जेस्तव तक्रार दाखल करत नाहीत. चोरीसारख्या अपराधांमध्येही 12 टक्के महिलांचे म्हणणे आहे की वस्तूची किंमत तक्रार दाखल करण्याइतकी मोठी नव्हती.