Aditya thackeray : आदित्य ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर महापालिकेची टांगती तलवार?

आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महापालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे  

Updated: Jul 20, 2022, 04:41 PM IST
Aditya thackeray : आदित्य ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर महापालिकेची टांगती तलवार? title=

Aditya thackeray : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी प्रकल्पात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महापालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडून लोकांना त्रास सहन करावा लागत होता. शिवाजी पार्कमधील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून एक प्रकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये मैदानात हिरव्या गवताची पेरणी करण्यात आली होती. तसेच शिवाजी पार्कच्या नुतनीकरणावरही भर देण्यात आला होता. 

या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, धुळीच्या प्रदूषणाची समस्या कमी न होता अधिक वाढल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्क प्रकल्पाच्या सध्याच्या कामात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेने हे बदल करण्याकरता पुन्हा एकदा रहिवाशांकडून सुचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. तसेच, प्रकल्पाकरता नेमण्यात आलेल्या कोअर कमिटीची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे.

महापालिकेचे स्पष्टीकरण
या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा विचार करण्यात आलेला नाही. रहिवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन काही बदल केले जातील असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे प्रकल्प?
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा कायापालट करण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. मैदानात उडणाऱ्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासातून रहिवाशांची सुटका करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच मैदानात हिरव्या गवताची पेरणी करण्यात आली आहे.