दोषी विद्यार्थ्यांना अटक केल्याशिवाय शाळेबाहेर पडणार नाही, पालकांची भूमिका

दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केलीय. 

Updated: Sep 1, 2018, 12:17 PM IST
दोषी विद्यार्थ्यांना अटक केल्याशिवाय शाळेबाहेर पडणार नाही, पालकांची भूमिका title=

मुंबई : मुंबईतील चारकोप भागातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये एका विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली... परंतु, 48 तासानंतरही शाळा प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही... यामुळे पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातलाय. या मुलांवर शाळेकडून कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचं वातावरण दिसतंय. 

या सगळ्या प्रकारावर, घडलेला सगळा प्रकार धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय. दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केलीय.

काय आहे तक्रार...

'माझी मुलगी शाळेत आली असताना तिच्या पाठिमागून पाच - सहा मुले येऊन उभी राहिली... त्यांनी तिचा स्कर्ट वर करून तिची छेडछाड केली... ती रडत असतानाही शाळेच्या सिक्युरिटीनं त्यांना थांबवलं नाही... या घटनेची तक्रार मुलीनं जेव्हा मुख्याध्यापिकेकडे केली तेव्हा त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केलाच... शिवाय मुलीलाच दमदाटी करून शांत केलं', अशी तक्रार मुलीच्या आईनं केलीय.

यानंतर मुलीच्या आईनं तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं. परंतु, आठ तासानंतरही तक्रार नोंदवली गेली नाही... रात्री दोन वाजता मुलीचं मेडिकल केलं गेलं... सकाळी 11 वाजताही पोलीस शाळेत गेले नाहीत तेव्हा त्यांना जाब विचारला असता आपल्याकडे स्टाफ उपलब्ध नसल्याचं तक्रारकर्त्या मुलीच्या आईनं एका व्हिडिओत म्हटलंय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

यानंतर, मुलीच्या आईनं आणि शाळेतल्या आणखीन काही पालकांनी गोंधळ घातल्यानंतर पोलीस शाळेत हजर झाले... आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातलाय.