राज्यात वीज दर वाढीचे संकट, ग्राहकांना बसणार 'शॉक'

राज्यात वीजेचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सुधारित वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2018, 03:26 PM IST
राज्यात वीज दर वाढीचे संकट, ग्राहकांना बसणार 'शॉक' title=

मुंबई : राज्यात वीजेचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सुधारित वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केलाय.

महावितरणची दरवाढीची मागणी

महावितरण कंपनीने दोन वर्षांत २९ हजार ४१५ कोटी रूपयांची दरवाढ करण्याविषयीचा प्रस्ताव राज्य विद्युत नियामक आयोगापुढे सादर केलाय. विद्युत नियामक आयोगाने महावितरणची दरवाढीची मागणी मान्य केली तर वीज दर वाढ होणे क्रमप्राप्त आहे.

घरगुती वीज महागणार

वीज दरात २१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच एका युनिटमागे एक रूपया ३७ पैशांची वाढ होणार आहे, असे राज्य विद्युत ग्राहक संघटनेचे प्रताप हेगडे यांनी स्पष्ट केलेय.

बोजा ग्राहकांवर पडणार

महावितरणाकडून विद्युत आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात फक्त दर वाढीचा नाही तर स्थिर दरवाढीसाठीही परवानगी मागितली आहे. याचाही बोजा हा ग्राहकांवर पडणार आहे. वर्ष २०१५-१६ आणि वर्ष २०१६-१७ मधील खर्चाच्या ताळमेळासाठी महावितरणाने १२ हजार ४४२ कोटी रूपयांची मागणी विद्युत आयोगाकडे केलेय.