ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा

Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे. 

सायली पाटील | Updated: Oct 27, 2023, 09:43 AM IST
ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा  title=
Maharashtra weather some regions experiance winters latest Update

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या अखेरीपासूनच राज्यातून पावसानं काढता पाय घेतला. हवामान विभागानं परतीच्या पावसाच्या सरी अधूनमधून राज्यात बरसतील असा इशारा देऊनही या सरी काही बरसल्या नाहीत. उलटपक्षी ऑक्टोबर हीटनं अनेकांनात हैराण केलं. मुंबई, नवी मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त पाहायला मिळालं. ज्यामुळं तापमान 3 ते 4 अंशांनी जास्तच असल्याचं भासलं. येते काही दिवस मुंबईतील उष्णतेचा हा दाह कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कुठे लागली थंडीची चाहूल?

एकिकडे उकाडा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील जवळपास 10 शहरांमध्ये तापमानाचा आकडा कमी होताना दिसत आहे. थोडक्यात या शहरांमध्ये आता थंडीची चाहूल लागली आहे. अद्यापही तापमान अपेक्षित प्रमाणात कमी झालेलं नसलं तरीही ही चाहूल मात्र अनेकांना मोठा दिलासा देऊन जात आहे. 

हेसुद्धा वाचा : मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई- पुणेकरांनो तुम्ही नक्की वाचा 

हवामान विभागाच्या माहितीनुसार नाशिकपासून सोलापूरपर्यंत तापमान चार ते पाच अंशांनी कमी भासत आहे. कमाल तापमानात मात्र फारशी घट झाली नसल्यामुळं आता याच आकड्यांकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. तिथं सातारा, पाचगणी, कोल्हापूर पट्ट्यामध्ये रात्री उशिरा आणि पहाटे वातावरणात समाधानकारक गारवा जाणवत असल्यामुळं आता अनेकांना हिवाळी सहलींचे वेधही लागू लागले आहेत. 

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार ईशान्य वाऱ्यांचा जोर वाढला असला आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली असली तरीही महाराष्ट्रात अपेक्षित हिवाळा अद्यापही सुरु झालेला नाही. ज्यामुळं उकाडा आणखी तीव्र होताना दिसत आहे.