'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.

राजीव कासले | Updated: Feb 13, 2024, 06:20 PM IST
'अशोक चव्हाण डरपोक,  मैदान सोडून पळाले!  ED, CBI ला घाबरून गेले का?' title=

Maharashtra Politics : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात (BJP) गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते  मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केला आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या (Congress) प्रमुख नेत्यांची बैठक झाली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी इतर कोणीही जाणार नाही, मल्लिकार्जून खऱगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसह जोमाने लढा देत राहिल.  अशोक चव्हाण दिल्लीत मलिकार्जून खरगे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटले, परवा बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली तरीही त्यांनी पक्ष सोडला. काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर काय अन्याय केला ? की ED, CEB  ला घाबरून ते गेले? याचे उत्तर जनतेला द्यावं, असा सवाल चेन्नीथला यांनी विचारला आहे.  अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने काँग्रस पक्ष कमजोर होणार नाही. पक्ष विचारधारेनुसार काम करत असतो, पार्टी सोडणाऱ्यांना जनता स्विकारत नाही. काँग्रेस पक्ष आणखी जोमाने काम करेल व लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ झाले'
भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपात गेले, भाजपाच्या वॉशिंग मधून धुवून ते स्वच्छ झाले. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळाचा आरोप पंतप्रधान मोदींनीच केला होता, त्यांनाही सत्तेत सहभागी करुन घतले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का?  महाराष्ट्र विकास आघाडी मजबूत आहे त्याला कमजोर करण्यासाठी भाजपा धडपड करत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही आम्ही चर्चा केली असून मविआ मजबूत आहे, महाराष्ट्रातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकू असा विश्वासही रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय.

भाजपात ती संधी मिळणार आहे का?
काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली पण भाजपात त्यांना ती संधी मिळणार नाही, आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल. असा टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. भाजपा अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही हे त्यांच्याच सर्वेत दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते त्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही.

15 तारखेला काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आहे त्यानंतर 16 व 17 तारखेला लोणावळ्यात शिबीर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला. 

विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला सुरु होता. अशोक चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, केंद्रात विविध खात्याचे मंत्री अशी संधी दिली. असे असताना ते भाजपात गेले याचा अर्थ त्यांच्यावर दबाव असावा किंवा स्वार्थासाठी ते भाजपात गेले असावेत. पण जनता जागृत आहे, भाजपाला धडा शिकवेल. महाविकास आघाडी मजबूत असून विधानसभेला विजय मिळून मविआचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.        

अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपाच्या राजकारणाला जनता कंटाळली असून जनताच यांची डोकी फोडेल. त्यांच्या जाण्याने आभाळ कोसळले नाही, नेते गेले म्हणजे कार्यकर्ते जात नसतात, असंही वडेट्टीवार म्हणाले.