काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे

Updated: Aug 9, 2021, 09:49 PM IST
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत title=

मुंबई : आगामी महानगरपालिका (Municipal Elections) आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) स्वबळाचा नारा दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. 

काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी - शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.