कोरेगाव - भीमा दंगल : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आयोगासमोर होणार साक्ष

कोरेगाव - भीमा दंगलीच्या चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत.

Updated: Jan 29, 2020, 06:00 PM IST
कोरेगाव - भीमा दंगल : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आयोगासमोर होणार साक्ष  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरेगाव - भीमा दंगलीच्या चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आयोग फडणवीस यांना साक्षीसाठी बोलवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे पाटील यांनी फडणवीस यांना साक्षीसाठी बोलवण्याची आयोगाकडे मागणी केली होती.

Related image

कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साक्ष देण्यासाठी पाचारण केले आहे. याप्रकरणी फडणवीसांची साक्ष घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे पाटील यांनी केली होती. त्यानुसार चौकशी आयोग फडणवीस यांना साक्षीसाठी बोलावणार आहे. फडणवीस यांनी न्याय होण्यासाठी सहकार्य करावे, असे मत आयोगाने व्यक्त केले आहे.

काय होता सत्यशोधन समितीचा अहवाल?

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर, कोरेगाव भिमा येथील दंगल रोखता आली असती, असे सांगत कोरेगाव भिमा दंगलीचे खापर पोलिसांच्या माथी मारण्यात आले आहे. कोरेगाव भिमा येथील दंगल प्रकरणी विवेक विचार मंचच्यावतीने सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत मंचचे अध्यक्ष आहेत. समितीचा अहवाल २४ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित करण्यात आला होता.

या अहवालात कोरेगाव दंगल हे पोलिसांचे अपयश असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना जबाबदार धरतानाच, तत्कालीन गृह खाते, तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्य सरकारला क्लीन चीट देण्यात आली होती. उलट पोलिसांनी सरकारला खोटी आणि चुकीची माहीती देऊन सरकारची दिशाभूल केली. त्यामुळे विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि रश्मी शुक्ला या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, दंगल हे पोलिसाचे अपयश असल्याचं सांगतानाच, प्रकाश आंबेडकर, माओवादी संघटना, कबीर कला मंच, एल्गार परीषद यांना दंगलीसाठी जबाबदार धरण्यात आले होते. यांनी दंगल भडकवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मिलिंद एकबोटे यांना मात्र एकप्रकारे क्लीन चीट देण्यात आली होती. मिलिंद एकबोटे याचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचं समितीच्यावतीने सांगण्यात आले होते. 

पूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहेत. मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांना संघाची कावीळ झाली, अशी टीका माजी खासदार प्रदीप रावत यांनी केली होती.