अनिल देशमुख यांना अटक, आता एनसीपी, शिवसेना नेत्यांची वेळ, किरीट सोमया यांचा इशारा

वसूली प्रकरणात एनसीपी आणि शिवसेना नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Updated: Nov 5, 2021, 02:48 PM IST
अनिल देशमुख यांना अटक, आता एनसीपी, शिवसेना नेत्यांची वेळ, किरीट सोमया यांचा इशारा title=

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणात अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे 'अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांची पाळी आहे.

वसुलीचा पैसा मुलगा, जावई, साथीदार आणि अनिल परब यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचायचा. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख सीबीआय आणि ईडीच्या निशाण्यावर आले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांच्या मुलाची चौकशी होणार

अनिल देखमुख यांचा मुलगा ऋषिकेश देखमुख यांच्यापर्यंत मनी लाँड्रिंग प्रकरणाची धग पोहोचली आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर ईडीने त्यांचा मुलगा ऋषिकेश यालाही समन्स बजावलं आहे. ऋषिकेश देशमुख यांनी सात दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रकरणी ईडी ऋषिकेशची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

परमबीर सिंह यांचे गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचखोरी आणि बेकायदेशीर खंडणीचा खटला सुरू होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाजे यांच्यामार्फत दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांनंतर अनिल देशमुखही चौकशीच्या फेऱ्यात आले असून सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. देखमुख यांना गेल्या आठवड्यातच अटक करण्यात आली होती.