मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर

सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर 

Updated: Jul 2, 2019, 09:23 AM IST
मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर  title=

मुंबई : सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरीय भागात पावसाने पुन्हा एकदा चांगला जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर, रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यामुळे आणि एकंदर पावसाचा जोर पाहता मुंबईची लाईफलाईनही विस्कळीत झाली. पुढील काही तासहीपावसाची हीच परिस्थिती पाहता मुंबईसह तीन जिल्ह्यांत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहील अशा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. शिवाय सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी समुद्राला मोठी भरतीही येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पावसाची सुरु असणारी कोसळधार पाहता सतर्कतेचा इशारा देत शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, सरकारी कार्यालयांनाही मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेषत: मुंबई, ठाणे,  नवी मुंबई या भागात असणारी शाळा विद्यालयं आज बंद राहतील. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. 

अतिमहत्त्वाचं काम असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा आजचा दिवस घराबाहेर पडणं टाळा असं आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेल्या या पावसाचे थेट परिणाम लोकल सेवेवरही पाहायला मिळत आहेत. सोमवारपासूनच धीम्या गतीने सुरु असणाऱ्या मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 

ठाणे ते सीएसएमटी दरम्यानच्या रेल्वे गाड्या बंद आहेत. तर, मनमाडकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्ये रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यराणी, पंचवटी आणि गोदावरीसह इतरही काही लांब पलल्याच्या रेल्वे गाड्या रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द 

मुंबई विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय मंगळवार्चया दिवशी असणाऱ्या, विद्यापीठाच्या वतीने निर्धारिक केलेल्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित परीक्षांचं बदललेलं वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर  जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मुंबई विमानतळावरही गर्दी

बरीच उड्डाणं पावसाचा अंदाज पाहता रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळांवर पाहायला मिळत आहे. अपघातामुळे मुख्य. धावपट्टीही बंद आहे. त्यामुळे दळवळणाच्या सर्व माध्यमांना या पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.