येत्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसाने मध्य रेल्वे ठप्प

Updated: Sep 4, 2019, 01:09 PM IST
येत्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा  title=

मुंबई : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. माटुंगा आणि सायन स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

दरम्यान मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या 2 दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पाऊस पडतो आहे. आजही पावसाचा जोर वाढल्यामुळे याचा फटका वाहतुकीला बसला आहे. मुंबईत येणारे अनेक प्रवासी रेल्वेत अडकून पडले आहेत.