Good News : मुंबईत रेल्वे, बस, मेट्रोसाठी एकच तिकीट

शहर बस वाहतूक अर्थात बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रोसाठी एकच तिकीटाची योजना अमलात येत आहे.  १ मार्चपासून मोनो, बेस्ट, रेल्वेचा प्रवास एकाच तिकिटावर करता येणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2018, 11:24 AM IST
Good News : मुंबईत रेल्वे, बस, मेट्रोसाठी एकच तिकीट   title=

मुंबई : शहर बस वाहतूक अर्थात बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रोसाठी एकच तिकीटाची योजना अमलात येत आहे.  १ मार्चपासून मोनो, बेस्ट, रेल्वेचा प्रवास एकाच तिकिटावर करता येणार आहे. 

 बेस्ट, रेल्वेचा प्रवास एकाच तिकिटावर

मुंबई शहरात प्रवासासाठी एकच तिकीट, असावे अशी मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला यश आले असून १ मार्चपासून मोनो, बेस्ट, रेल्वेचा प्रवास एकाच तिकिटावर करता येणार आहे. याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

प्रवाशांचा वेळ वाचणार 

बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रो, मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवेसाठी एकच तिकीट प्रणाली असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रूपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

 एकात्मिक तिकीट प्रणाली

या प्रणालीच्या र्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. एकाच तिकिटासाठीच्या एकात्मिक तिकीट प्रणालीचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, सहआयुक्त संजय देशमुख, के. विजयालक्ष्मी यांच्यासह रेल्वे, मेट्रो, परिवहन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. तिकीट प्रणाली सुरू करण्यासंदर्भात नेमलेल्या पीएमसी या सल्लागार कंपनीचे मनीष अग्रवाल यांनी सादरीकरण केले.

पहिल्या टप्प्यात 

बेस्ट, मोनोरेल आणि रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात 

मेट्रो, वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षाचा समावेश होईल. त्याबरोबरच नंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी व्यवस्था हवी

ही सेवा मुंबई, ठाणे शहरांपुरतीच मर्यादित न ठेवता राज्यातील कुठल्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याजोगी व्यवस्था करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेय.