कोरोनाशी लढा : राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर

एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.  

Updated: Jun 19, 2020, 06:53 AM IST
कोरोनाशी लढा : राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर title=
संग्रहित छाया

मुंबई : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आहे. राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. 

 राज्यात सध्या ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात गुरुवारी १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३  नमुन्यांपैकी  १ लाख २० हजार  ५०४  नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८१ हजार  ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  काल झाली आहे. कालच्या नोंदणीनुसार मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-९९ (मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई-विरार १), नागपूर-१ (नागपूर मनपा १).

गुरुवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.