विधानपरिषद निवडणूक: रामराजे आणि माणिकरावांचं पद अडचणीत

निवडणुकीत भाजपकडे मोठी संधी

Updated: Jun 22, 2018, 11:14 PM IST
विधानपरिषद निवडणूक: रामराजे आणि माणिकरावांचं पद अडचणीत title=

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडील विधानपरिषदेतली सभापती पदावर गंडांतर येण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचे उपसभापतीपदही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 16 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आहेत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे असे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, अमरसिंह पंडित, नरेंद्र पाटील असे चार आणि शिवसेनेचे अनिल परब, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर तर भाजपचे भाई गिरकर यांची मुदत संपत असल्याने ही निवडणूक जाहीर झाली आहे.

सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपा विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजपा विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. सध्या विधानपरिषदेतील कमी संख्याबळामुळे सत्ताधारी भाजपाला अनेकदा विरोधकांच्या आक्रमकपणाला तोंड द्यावं लागतं. पण हे चित्र बदलण्याची संधी 16 जुलैच्या या निवडणुकीमुळे भाजपाला मिळणार आहे.

पाहा काय आहे संख्याबळ

राष्ट्रवादी काँग्रेस - 21
काँग्रेस - 19
भाजप - 18
शिवसेना - 9
जेडीयू - 1
शेकाप - 1
अपक्ष - 6
पीपल्स रिपब्लिकन पक्ष - 1

अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 जुलै असणार आहे तर अर्जाची पडताळणी 6 जुलैला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 9 जुलै आहे. मतदान 16 जुलैला 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे तर मतमोजणी 16 जुलैला सायंकाळी 5 वाजेनंतर होणार आहे.