मुंबई ते दिल्ली अंतर होणार आणखी कमी! एप्रिलपासून 160 किमी वेगाने धावणार गाड्या; रेल्वेकडून मोठी अपडेट

Railway Train speed News: रेल्वेच्या या उपक्रमानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तसंच तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि इतर प्रीमियम रेल्वे त्यांच्या अंतिम स्थानकांवर नियोजित वेळेच्या 25 ते 30 मिनिटे आधी पोहोचणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 18, 2024, 08:13 AM IST
मुंबई ते दिल्ली अंतर होणार आणखी कमी! एप्रिलपासून 160 किमी वेगाने धावणार गाड्या; रेल्वेकडून मोठी अपडेट title=

Railway Train speed News: आता मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावेळी गुजरात, राजस्थानमार्गे मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी आहे. मार्च किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ट्रेनचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

रेल्वेच्या या उपक्रमानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तसंच तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि इतर प्रीमियम रेल्वे त्यांच्या अंतिम स्थानकांवर नियोजित वेळेच्या 25 ते 30 मिनिटे आधी पोहोचणार आहे. या मार्गाच्या प्रिमियम गाड्यांना रेल्वे मार्ग अपग्रेड करण्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

ट्रॅक-सिग्नस सिस्टीम अपग्रेड करण्यात येणार

मुंबई-दिल्ली मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणा अपग्रेड करण्याचं काम सुरू आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत रेल्वे मार्गाच्या सुधारणांचे काम पूर्ण होऊ शकतं. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील गाड्या 160 किमी धावणार आहे. 

मुंबई सेंट्रल डिव्हिजनचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा याबाबत माहिती देताना म्हणाले की, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ट्रॅक आणि सिस्टीम अपग्रेड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून याबाबत परवानगी मिळाल्यानंतर प्रीमियम गाड्यांचे संचालन 160 किमीपर्यंत केलं जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा जवळपास 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज 170 लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातात. यामध्ये या अपग्रेडेशननंतर लांब पल्ल्याच्या 120 गाड्यांचा वेग वाढवता येणार आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सुमारे 100 किमी अंतरावर चालतात. याशिवाय बोरिवली ते विरार दरम्यान 110 कि.मी. च्या वेगाने केले जाते.

विरार स्टेशननंतर वाढणार गाड्यांचा स्पीड

विरार आणि अहमदाबाद दरम्यान 130 किमी. च्या वेगाने गाड्या धावतात. रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या अपग्रेडेशनचे काम पूर्ण होताच मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून विरार ते अहमदाबाद दरम्यान गाड्यांचा वेग 160 किमी होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात येतंय. एकंदरीत या गाड्यांचा स्पीड विरार स्टेशननंतर वाढणार असल्याचं समोर आलं आहे.