'नोटबंदीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कधी करणार ?'

 'ज्यांनी ही चूक केली त्यांना शिक्षा कधी करणार ?' असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी विचारलायं.

Updated: Nov 9, 2018, 04:42 PM IST
'नोटबंदीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा कधी करणार ?' title=

मुंबई : नोटबंदीला काल दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई काँग्रेसने आज केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबईत आंदोलन केलं. मुंबईतील आझाद मैदानावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 'नोटबंदी पूर्णपणे फसली असून त्याला जबाबदार कोण ?' असा सवाल काँग्रेसने या आंदोलनाद्वारे विचारलाय. तसेच 'ज्यांनी ही चूक केली त्यांना शिक्षा कधी करणार ?' असा सवालही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी विचारलायं.

जखमेच्या खुणा उघड्या 

'एखादी हानी भरून काढण्यासाठी काळ हे सर्वोत्तम औषध असते, असे म्हटले जाते. परंतु, दुर्दैवाने नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेली देशाची हानी कधीच भरून न येण्यासारखी आहे.

उलट दिवसेंदिवस या जखमेच्या खुणा अधिकाअधिक उघड्या पडत असल्याचे', वक्तव्य देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले.

बेरोजगारीचा उच्चांक 

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील बेरोजगारीत वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई)  केलेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष चिंता वाढवणारे आहेत.

या सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण ६.९ टक्के इतके नोंदविण्यात आले.

बेरोजगारीचा हा गेल्या दोन वर्षांतील उच्चांक आहे.