कोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये

 कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.

Updated: Apr 4, 2020, 08:45 AM IST
कोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिली.

राज्याचे पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून योगदान देत आहे. शुक्रवारी मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये कोरोनाशी दोन हात करताना पोलीस दलातल्या एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  काल मंत्रालयात आयोजित बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ,आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने द्यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.