मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या.

Updated: May 24, 2020, 02:27 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे  title=

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुसरीडे विरोधी पक्ष असलेला भाजप आंदोलन करतोय तसेच राज्यपालांकडे तक्रारी करतोय. अशा दुहेरी आव्हानांचा मुख्यमंत्री सध्या सामना करत आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधत केंद्राच्या पॅकेज सिस्टिमवर शेलक्या शब्दात टीका केली. तसेच राज्यातील विरोधकांना देखील राजकारण न करण्याचे आवाहन केले. लॉकडाऊन असा शब्द उल्लेख न करता हळूहळू आपण काही गोष्टी सुरु करत जाऊ फक्त तुम्ही सहकार्य करा असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  

 कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतेय. हा विषाणु गुणाकार करत जातो. मे महिन्याच्या शेवटी सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असू शकतील असा अंदाज केंद्राच्या टीमने व्यक्त केला होता. आजच्या दिवशी राज्यात ३३ हजार ६८६ रुग्ण आहेत. १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या. दुर्देवाने १५७७ मृत्यू झाले आहेत.

येत्या काही काळांत राज्यात कोरोनाच्या केसेस वाढणार आहेत. रुग्णांची आबाळ होत आहे, हे खरं आहे. असं लक्षात आलं आहे की रुग्णांना व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिलमध्ये हजाराच्या आसपास बेड होते. मे अखेरीस १४ हजार बेड उपलब्ध होतील. यावेळी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पावसाळ्यात नागरिकांनी जास्त दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले.

रस्त्यावर न उतरता घरुनच प्रार्थना करा आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा असे आवाहन मुस्लिम बांधवाना मुख्यमंत्र्यांनी केेले. 

महत्वाचे मुद्दे 

मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलांची बालकं कोरोना निगेटीव्ह आल्याचे वृत्त ऐकून आनंद झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आधी आरोग्य सुविधा देतो नंतर पॅकेज देतो.

पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही असे म्हणत केंद्राच्या 'पॅकेज'वर त्यांनी टीका केली. 

राज्याने आतापर्यंत ४८१ ट्रेन सोडल्या. यामध्ये ७ लाखापर्यंत प्रवासी मजुरांची सोय केली. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

रोज ८० ट्रेनची मागणी करतोय पण आपल्याला ३० ते ४० ट्रेन आपल्याला दिल्या जात आहेत. 

सर्व मजुरांची नीट सोय करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तिकिट घेतलेलं नाही. केंद्राची वाट न बघता राज्याने खर्च केलाय.

रस्त्याने मजुर निघाले होते. एसटी ने रस्त्याने जाणाऱ्या लोकांना स्थानकापर्यंत तसेच परराज्यापर्यंत सोडण्यात आले. ५ ते २३ मे पर्यंत एसटीच्या ३२ हजार फेऱ्या झाल्या. यामध्ये एसटीच्या माध्यमातून ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या स्थानक किंवा घरापर्यंत सोडले. यांच्यासाठी राज्य सरकारने ७५ कोटी खर्च केला आहे. 

इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा सांगितलं नाही. त्यांना घरी जायचं होतं. आपण केंद्राकडे परवानगी मागितली पण तेव्हा मिळाली नाही. आता हे संकट वाढल्यानंतर ही परवानगी मिळाली. 

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निर्णय देखील व्यवस्थित घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

जवळपास ५० हजार उद्योग सुरु झाले. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरु झाले आहे. ग्रीन झोनमध्ये जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरु आहे.

शेतकऱ्यांला बांधावरच बीबियाणे उपलब्ध करुन दिले जाण्यासंदर्भात विचार सुरु आहे. कापूस खरेदी, दुध उत्पादक, आरोग्याच्या बाबतीतही आपण विचार करतोय असे मुख्यमंत्री म्हणाले. 

रत्नागिरीत टेस्ट लॅबसाठी परवानगी देण्यात आली आहे. 

पुढच्या महिन्यात वारी येतेयं वारकऱ्यांसोबत देखील बोलण सुरु आहे.

हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे कोणी राजकारण करु नका. तुम्ही केलं तरी आम्ही करणार नाही. केंद्राकडूनही अनेक गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या नाहीत मग मी बोंब मारु का ?  असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. फक्त राजकारण म्हणून राजकारण आम्ही करणार नाही. 

लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा. हळूहळू काय सुरु करायच याची यादी मी देत जाईन पण तुम्ही सहकार्य करा.