राज्यपालांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही का ?- अरविंद सावंत

खासदार अरविंद सावंत यांची टीका 

Updated: Oct 13, 2020, 06:35 PM IST
राज्यपालांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही का ?- अरविंद सावंत  title=

मुंबई : राज्यपालांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही का ? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ज्यापद्धतीने पत्र लिहिलं आहे ते अतिशय वेदनादायी असल्याचे सावंत म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. शिवसेना नेत्यांनी देखील राज्यपालांच्या पत्रावर निशाणा साधलाय. 

राज्यपालांकडून राजकीय हेतूने हिंदुत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलाय. संविधानात धर्मनिरपेक्ष शब्द आहे. ते शपथ घेताना हे विसरले का ? याचा अर्थ राज्यपालांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही का ? असा प्रश्न सावंतांनी उपस्थित केलाय. राज्यपालांनी मार्गदर्शन करावं मात्र त्याला राजकीय वळण देऊन आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणं राज्यपालांना शोभणारं नसल्याचे

आमच्या रोमारोमात हिंदुत्व आहे. महाविकास आघाडी सरकार बनल्यावरही उद्धव ठाकरे आयोद्ध्येला गेले. आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक असून आमच्या हिंदुत्वात द्वेष नसल्याचा टोलाही सावंत यांनी लगावला. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं स्वागत करणार आमचं हिंदुत्व नसल्याचेही ते म्हणाले. 

राऊतांचा टोला 

आम्हाला हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावलाय. राज्यपालांनी हे राज्य घटनेनुसार चालते की नाही ते पहायचे, बाकीच्या इतर गोष्टी लोकनियुक्त सरकार पाहत असते असे टोला राऊतांनी लगावला. अनलॉक काढतानाचे निकष सरकार ठरवते असेही ते म्हणाले. 

हिंदुत्व प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर 

'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही'. 

धर्मनिरपेक्षता स्वीकारली का, अशा रोखानं सूर आळवणाऱ्या राज्यपालांना केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या घटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेचा गाभा असणारी धर्मनिरपेक्षता मान्य नाही का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांच्या पत्राचं उत्तर दिलं. 

जनतेच्या जीवाची काळजी घेण्यास प्राधान्य 

जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणं चुकीचं तसंच तो एकदम उठवणंही अयोग्यच, ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. इतकंच नव्हे तर, राज्यपालांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करत सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी हमी त्यांनी दिली.