कंगना प्रकरणावर शिवसेनेनंतर आता काँग्रेसकडून 'मौन'

कंगनाने सोनिया गांधींना विचारले प्रश्न

Updated: Sep 11, 2020, 01:11 PM IST
कंगना प्रकरणावर शिवसेनेनंतर आता काँग्रेसकडून 'मौन' title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यानंतर कंगना राणावत हिने या वादात काँग्रेसलाही ओढलं आहे. बाळासाहेब ठाकरेंची 'शिवसेना' आता 'सोनिया सेना' झाली आहे असं ट्विट कंगणाने केलं होतं. मात्र याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे महाराष्ट्र काँग्रेसने ठरवलं आहे. कंगना राणावत उचकवण्याचा प्रयत्न करत असली तरी याकडे दुर्लक्ष करावे, याप्रकरणी प्रतिक्रिया देऊन कंगना आणि या प्रकरणाला मोठं करू नका अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या नेत्यांना आणि प्रवक्त्याना दिल्या आहेत.

शिवसेनेनंतर काँग्रेसने ही कंगना राणावत प्रकरणी 'मौन' बाळगण्याचे ठरवले आहे. कंगनाच्या विषयावर बोलू नका, असे सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आले. कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीने हातोडा चालवला, त्यावरही न बोलण्याचं शिवसेनेने नेत्यांना सांगितलं आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केला, पण कंगनाप्रकरणी शिवसेनेने मौनच बाळगलं. संजय राऊत यांनीही या वादावर बोलण्यास नकार दिला.  

कंगनाने शिवसेनेनंतर आता सोनिया गांधींना उद्देशून ट्विट केले आहेत. या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश केले आहेत. कंगना ट्विटमध्ये लिहिते की, आदरणीय सोनिया गांधी जी, एक महिला होण्याच्या नात्याने तुमच्या महाराष्ट्र सरकारने मला जी वागणूक दिली. त्याबद्दल तुम्हाला दुःख झालं नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार आपल्या सरकारला वागणुक करायला सांगणार नाही का?  

कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करू नका, असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. विमानतळावर आंदोलन झाल्यास त्याची सहानुभूती कंगनाला मिळेल, अशी शिवसेना नेतृत्वाची भावना आहे. कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई हीच व्यूहरचना शिवसेनेनं आखल्याची माहिती आहे.