सोमवारपासून एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार..!

 गरज भासल्यास आणखीन बसेस सोडण्याची एसटीची तयारी

Updated: Jun 6, 2020, 07:29 PM IST
सोमवारपासून एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार..! title=

मुंबई : सोमवारपासून मंत्रालय आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीने अतिरिक्त २५० बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजे ,पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार असून त्यापैकी १४२ बसेस विशेषतः मंत्रालय, १५ बसेस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. उर्वरित (सुमारे१००) बसेस मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावतील. (सध्या ४०० बसेस धावत आहेत.) 

या सर्व बसेस योग्य रीतीने सॅनिटाराईज केलेल्या असून, प्रवासात सोशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. २३ मार्च पासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसेसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात.

दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखीन जादा बसेस एसटी कडून सोडण्यात येतील, असे एसटी प्रशासनाने कळविले आहे.