राज्यासाठी 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करणार- मुख्यमंत्री

 एकूण 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Updated: Aug 13, 2019, 02:12 PM IST
राज्यासाठी 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करणार- मुख्यमंत्री title=

मुंबई : महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता एकूण 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार तसेच नौदल, वायू दल, एनडीआरएफ या सर्वांचे आभार मानले. जेवढी मदत मागितली तेवढी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

2005 शी तुलना केली तर अभूतपूर्व पाऊस थोड्या कालावधीत पडला आहे. प्राथमिक माहितीनुसार आलेला अहवाल आपण केंद्राला पाठवत आहोत. याचे दोन भाग करत आहोत. कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रच्या भागसाठी 2105 कोटी रुपयांची मागणी करत आहोत. तर कोल्हापुर, सांगली आणि सातारा यासाठी 4700 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

पोलीस पाटील किंवा सरपंच यांनी जरी जनावरांच्या नुकसनाबद्दल जरी सांगितलं तरी ते ग्राह्य धरून तशी नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मंत्रिमंडळ उपसमिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असून ती पूरग्रस्त भागाच्या मदतीबाबत आवश्यक निर्णय घेणे, शासन अध्यादेशात सुधारणा, ऐनवेळी घ्यावे लागणाऱ्या निर्णयासाठी असेल.  

एक विशेष तज्ञ समिती तयार करत असून समितीमधील नावे लवकरच निश्चित केली जातील. थोड्या दिवसांत झालेला एवढा पाऊस, वातावरणातील बदल वगैरे यांचा अभ्यास करुन काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे सांगेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.