'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2024, 02:38 PM IST
'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग title=
राज ठाकरेंची मोठी घोषणा

Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. काहीही झालं तरी मला विधानसभेत मनसेची लोक बसवायची आहेत. यावर काही लोक हसतील पण हे होणार, असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केला.

मी खरंच सांगतो...

"आपल्या पक्षाचा सर्वे झाला आहे. मी पाच-पाच लोकांच्या टीम बनवून प्रत्येक जिल्ह्यात पाठवल्या होत्या. सगळ्यांकडे त्यांनी विचारपूस केली आहे. आज तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणून परत जिल्ह्यात येतील ते तुम्हाला भेटतील. परिस्थिती समजावून सांगा, आकलन करा. काय घडू शकतं होऊ शकतं याचा विचार करा. मी खरंच सांगतो, निवडून येण्याची क्षमता आणि तयारी असलेल्यांनाच तिकीट दिलं जाईल. जिंकून आल्यावर पैसे काढायला मोकळा अशा कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही," असंही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. "तुम्ही जे बोलाला, जे जिल्हा आणि तालुका अध्यक्षांना सांगाल ती माहिती प्रमाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक करणार आहोत," असं राज ठाकरे म्हणाले.

काहीही झालं तरी...

"येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला मनसेचे आपले सर्व पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवायचे आहेत. अनेक लोक हसतील. हसू देत. मला काही हरकत नाही त्याला. पण ही गोष्ट घडणार म्हणे घडणार," असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> 'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा

मी यादी घेऊन बसलो होतो...

"मी यादी घेऊन बसलो होतो. अशी परिस्थिती मी कधी पाहिली नाही. सगळे मतदारसंघ पाहत होतो. कोण कोणत्या पक्षात आहे विचारावं लागतं. कोण कुठे गेला आहे काही कळत नाही. विधानसभेला होणारं घमासान न भुतो असं असेल," असं भाकित राज यांनी व्यक्त केलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा राज ठाकरेंनी निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा >> अमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा

मनसेचा बिनशर्त पाठिंबा

मनसेनं लोकसभेला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभेला मनसेने एकला चलो चा नारा दिला असून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. लोकसभेला राज ठाकरेंना महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी जिथे जिथे प्रचारसभा घेतल्या तिथे महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला होता. आता राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा आढावा घेण्यासाठी 1 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत.