ओएनजीसी प्रकल्पात पुन्हा वायू गळती, संतप्त ग्रामस्थांची प्रकल्पावर धडक

 ओएनजीसी प्रकल्पात आज पुन्हा नाफ्ता या वायूची गळती झाली.  

Updated: Sep 25, 2019, 06:50 PM IST
ओएनजीसी प्रकल्पात पुन्हा वायू गळती, संतप्त ग्रामस्थांची प्रकल्पावर धडक  title=

नवी मुंबई : उरणमधील ओएनजीसी प्रकल्पात आज पुन्हा नाफ्ता या वायूची गळती झाली. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. मंगळवारी रात्री ही वायू गळती झाली. सकाळी वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात ओएनजीसी प्रशासनाला यश आले. गेल्या २२ दिवसातील ही दुसरी घटना असल्यानें परिसरात भितीचे वातावरण होते.

याच महिन्याच्या तीन सप्टेंबरला मोठी वायूगळती होऊन स्फोट झाला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. तसेच नाल्यामध्ये आग लागून येथील झाडे आणि घरांचे नुकसान झाले होते. आज देखील मोठ्याप्रमाणात वायू गळती झाली होती. वेळीच लक्षात आल्याने येथील नागाव तसेच पिरवाडी समुद्रावर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

तसेच ग्रामस्थांना सावध करून गावातील वीज बंद करण्यात आली. कोणतेही ज्वलनशील पदार्थ पेटवण्यास मनाई करण्यात आली. मात्र या वायूगळतीने येथील ग्रामस्थांमद्ये भीतीचे वातावरण होते. संतप्त नागरिकांनी ओएनजीसी प्रशासनाच्या गेटवर धरणे आंदोलन करत याबाबत विचारणा केली.