पहिल्याच पावसात मुंबईची दैना! विलेपार्ले, विद्याविहारमध्ये इमारती कोसळल्या, 2 ठार

Mumbai Building Collapsed: विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयात शेजारील दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. तर, विद्याविहारमध्येही एक तीन मजली इमारत खचली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 25, 2023, 05:46 PM IST
पहिल्याच पावसात मुंबईची दैना! विलेपार्ले, विद्याविहारमध्ये इमारती कोसळल्या, 2 ठार title=
Two dead after parts of building collapses in Vile Parle

मुंबईः पहिल्याच पावसात मुंबईची (Mumbai Rain) दाणादाण उडाली आहे. शनिवारपासून कोसळत असलेल्या पावसामुळं धोकादायक इमारतींची पडझड झाल्याच्या घटना घडत आहे. विद्याविहारमध्ये एक तीन मजली इमारत खचली आहे. तर, विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालया शेजारी असलेली दोन मजली इमारत कोसळली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालया शेजारी असलेली दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. भरधाव पावसामुळं इमारत कोसळली असून इमारतीच्या ढिगार्‍याखालून पाच जणांना बाहेर काढण्यात आले होते. त्यांना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. तसंच, ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का याचा तपास करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, विद्याविहारमध्येही इमारत खचली असल्याची घटना समोर आली आहे. चित्तरंजन कॉलनीत आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास एक इमारत कोसळली आहे. तळमजला अधिक 3 मजली ही इमारत होती. यात दोन कुटुंब राहत होते. त्यातील 3 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे तर 2 जण अजूनही आत अडकले आहेत. यात  नरेश पालांडे वय ५६ आहे आणि त्यांची 94 वर्षांची आई बिल्डिंगमध्ये अद्यापही अडकून पडले आहेत.

इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान गेल्या 7 तासांपासून प्रयत्न करत आहेत. ही इमारत पूर्णतः एका बाजूला झुकली आहे. एनडीआरएफचे पथक अत्याधुनिक यंत्रणेसह अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्यापही त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. 

नाल्यात पडून दोघांचा मृत्यू

मुंबईत पावासने दोन बळी घेतले आहेत. गोवंडी परिसरात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.  रामकृष्ण( वय 25 वर्षे) आणि सुधीर दास (वय 30 वर्षे) अशी मृतांची नावे आहे. दोघेही कंत्राटी सफाई कामगार असल्याचे समजते. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघेही गोवंडी परिसरात नालेसाफाईचे काम करत होते. यावेळी ते नाल्यात पडले