सरसकट सर्व नुकसानाचा पंचनामा गरजेचा, मोठ्या मदतीची गरज - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मागील 2 दिवसापासून विदर्भ दौऱ्यावर आहेत.

Updated: Nov 15, 2019, 12:45 PM IST
सरसकट सर्व नुकसानाचा पंचनामा गरजेचा, मोठ्या मदतीची गरज - शरद पवार title=

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. पूर्व विदर्भात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे. पिकांच्या नुकसानीची माहिती शरद पवारांनी अगदी बांधावर जावून घेतली. शेतकऱ्यांना मदत नेमकी कशी पोहोचवता येईल, यावर देखील त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली यानंतर याची माहिती त्यांनी आज नागपुरात पत्रकारांना दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी खालील मुद्दे मांडले.

33 टक्केपेक्षा जास्त नुकसानीचाच सर्वे - शरद पवार

पिकनुकसानीचा सर्वे अजून मोठ्या प्रमाणात सर्वे बाकी, 33 टक्केपेक्षा जास्त नुकसानीचाच सर्वे केला गेला आहे, पण आणखी सर्व पिकांच्या नुकसानीचा सर्वे केलं जाणं महत्वाचं आहे.

सर्व पिकांचा सरसकट पंचनामा करा, यानंतर किती क्षेत्र बाधित आहे ते काढा. यानंतर मदतीची रक्कम ठरवणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सर्वच पिकांवर मोठा परिणाम - शरद पवार

महत्वाच्या पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे, संत्रा, कापसू ते धान सर्व पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, हे शेतकऱ्यांचं हे अभूतपूर्व नुकसान झालं असल्याचं शरद पवार म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर भरपाईचे पैसे यावेत - शरद पवार

संत्रा बागांचा बहर गेला आहे, सर्व शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर भरपाईचे पैसे जमा करण्यात येणे गरजेचे आहे. कपाशीच्या पिकाची वाढ चांगली पण त्याला बोंडं लागली नाहीत, साधारण 30 ते 40 बोंडं येणं गरजेचं आहे. पण तेही आलेले नाहीत.

नुकसान जास्त, मदत तुटपुंजी नको - शरद पवार

44 हजार 213 हेक्टर क्षेत्र बाधीत झालं, असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. हेक्टरी रूपये 6 हजार 800 मदत शेतकऱ्यांना मिळू शकते, पण मोठी मदत मिळणे गरजेचे असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं.