टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल...

Tomato Price Hike In Maharashtra: टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं गृहिणींचे बजेट बिघडले आहे. आता टोमॅटोचे दर जाणून घेऊयात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 23, 2024, 10:36 AM IST
टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल... title=
Tomato prices soar to Rs 200 per kg in maharashtra markets as rains hit supplies

Tomato Price Hike In Maharashtra: कधी काळी दर घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला फेकून द्यावा लागणाऱ्या टोमॅटोने आता सफरचंदाच्या दराचेही रेकॉर्ड मोडले आहेत. ऐन पावसाळ्यात टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटोला 150 ते 200 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. टॉमेटोच्या तुलनेत इतर भाजीपाल्याचे भाव मात्र घसरलेले आहे

टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. कारण भाज्यांमध्ये टाकला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे टोमॅटो. पण आता हाच टोमॅटो किचनचे बजेट वाढवच आहे. टोमॅटोची आवक सध्या कमी झाल्याने भाव वाढ होतांना दिसत आहे. पावसाने दिलेली ओढ आणि टोमॅटोच्या पिकाला आलेला रोग यामुळं आवक घटली आहे. त्याच परिणाम किंमतीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटोला 150 ते 2०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. टोमॅटोच्या तुलनेत इतर भाजीपाल्याचे भाव मात्र घसरलेले आहे. टोमॅटोबरोबरच मेथी, भेंडी, व शिमला मिर्चीचे थोडेफार दर वाढले आहे. दरम्यान, टोमॅटो बरोबर मेथी (१५ रू जुडी) तर हिरवी मिरची - २५० , शिमला - ४०० , वांगे - ६०० , कोथंबिर - २००, डांगर - ६०, गीलके - ४००, दोडके - ४०० असे प्रति जाळी भाव मिळत आहे.

नाशिकमध्ये टोमॅटोची आवक कमी

नाशिक जिल्ह्यात हवा त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने आणि टोमॅटोच्या पिकाला आलेला रोग, यामुळे नाशिकच्या शरद पवार मार्केट यार्ड आणि दिंडोरी रोडवरती असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे.  यामुळे टोमॅटोचे दर पुन्हा एकदा भडकले असून किरकोळ दलामध्ये टोमॅटोचे रेट तब्बल 100 रुपयापेक्षा जास्त झाले आहे. काल टोमॅटोच्या लिलावात 1100 ते 1200 रुपये प्रति जाळी असा भाव मिळाला आहे. यामुळे बाजार समितीत प्रति किलो 60 ते 70 रुपये टोमॅटोचे दर झाले आहेत. मात्र हेच दर किरकोळ विक्रेत्याकडे तब्बल 100 ते 120 रुपये प्रति किलो इतके दर झाले आहे. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावेळी शेतातून बाजार समितीमध्ये टोमॅटो विकला जातो तो आम्हाला कमी भावात विकावा लागतो. मात्र हाच दर व्यापाऱ्यांकडून दुपटीने वसूल केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत नसून हा फक्त व्यापाऱ्यांनाच फायदा होत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.