...म्हणून डायरेक्ट बस चोरली; यवतमाळमधील प्रकार पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

यवतमाळमध्ये ST बस चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ही बस चोरली आहे. 

Updated: Aug 2, 2023, 10:12 PM IST
...म्हणून डायरेक्ट बस चोरली; यवतमाळमधील प्रकार पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात  title=

Yavatmal News : यवतमाळध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने थेट बस स्थानकातून बस चोरी केली आहे. अवघ्या काही तासांतच हा बस चोरणारा पोलिसांच्या हाती लागला. मात्र, त्याने ही बस का चोरली याचे कारण समजल्यावर पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला. यवतमाळमध्ये या बस चोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

का चोरली बस?

गावी घरी जाण्यासाठी बसस्थानकावर बस उपलब्ध नसल्याने एका व्यक्तीने बसस्थानकावरून चक्क बसच पळविली आहे. यवतमाळच्या घाटंजी बसस्थानकावर हा बसचोरीचा प्रकार घडला आहे. ही बस मुक्कामासाठी आली होती. बस स्थानकावर लाऊन चालक वाहक खाली उतरले, दरम्यान भूषण लोणकर हा आरोपी त्याच्या गावी परतण्यासाठी बस शोधत होता. मात्र गावी जायला बस उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्याने बसस्थानकावर उभ्या या बसला चावी लागून असल्याचे बघून, बस सुरू करून गावाच्या दिशेने दामटली.  थोड्यावेळाने चालक वाहकांना बस जागेवर दिसली नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. दुसरीकडे एका पोलीस कर्मचाऱ्याला सदर विनाप्रवासी बस संशयास्पद दिसल्याने त्यांनी पाठलाग करून दुधाना जंगलाजवळ ती थांबविली असता बसचोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा

गडचिरोली जिल्ह्यातील लगाम ते आलापल्ली पर्यंतच्या खराब रस्त्यामुळे एसटी बस आहेत. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्ली पर्यंतच्या खराब रस्त्यामुळे मार्गातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस सेवा मिळत नसल्याचे ओरड काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर सुरजागड टेकड्यांवर खोदकाम करणाऱ्या लॅायड्स मेटल्स कंपनीने पर्याय शोधत कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सुरू केली. लॅायड्स मेटल्सच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता खराब झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस वेळेवर चालविण्यास एसटी महामंडळाने असमर्थता दर्शविली होती. त्यावर कंपनीने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवून देण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी बसफेऱ्या सुरू करण्याचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे शक्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ही बस लगाम ते आलापल्ली मार्गावरील बोरी, लगाम, खमनचेरू, सुभाषनगर, महागाव, कनेपल्ली, आपापल्ली अशा सर्व गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणार आहे.