'मी जिवंत आहे तोपर्यंत...', नारायण गडावरून जरांगेंची मराठा समाजाला भावनिक साद

नारायण गडावर पहिल्यांदाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली आहे. काय म्हणाले मनोज जरांगे? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 12, 2024, 02:26 PM IST
'मी जिवंत आहे तोपर्यंत...', नारायण गडावरून जरांगेंची मराठा समाजाला भावनिक साद title=

Beed Manoj Jarange Patil Speech | बीडमधील नारायण गडावर आज मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. जनसमुदायाच्या चरणी नतमस्तक होऊ जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला सुरुवात केली. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, मला वाटलं नव्हतं की एतकी गर्दी होईल. खरच मी खोटं बोलत नाही. हा दसरा मेळावा झाल्यानंतर निम्मे लोकं सरकारी दवाखान्यात जातील. 

माझी नजर जाईल तिकडे फक्त मराठा बांधव दिसत आहेत. मला एकजण बोलला होता की 500 एकर असतं का कुठे. आता तो दिसत नाही. मात्र, मी मीडिया बांधवाना एक विनंती करतो की त्यांनी चारही बाजूला त्यांचे कॅमेरे फिरवावे. या ठिकाणी आलेला जनसमुदाय राज्याला पण दिसू द्या. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील बांधवांना तो दिसू द्या. तुम्हाला विनंती आहे एकदा दाखवाच. दसरा मेळाव्याला आलेली गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल. 

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? 

नारायण गडावर बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांकडून वचन घेतलं आहे. ते म्हणाले की, मला एकच वचन द्या. मला तुमच्याकडून फक्त एकच वचन पाहिजे. मग मी तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त तुम्ही हट्ट धरू नका. एकच वचन द्या. आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आहे. एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल. मला हे वचन तुम्ही द्या. त्यामुळे मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे आहे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. त्यामुळे तुमचे हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही. या गडावरून तुम्हाला सांगतो तुमचं काम सोडून मी जाणरा नाही. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

'जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत....'

नारायण गडावरून मनोज जरांगे यांनी एक मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातून अश्रू येवू देणार नाही. असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा सांधला आहे. ते म्हणाले की, निवडून एकाकडून यायचं  आणि दुसरीकडे जायचं. असा करणारा मी नाहीये. मी इमानदार माणूस आहे. मला सर्व बाजूंनी घेरलंय आहे. पक्ष-पक्ष, नेता-नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकरांना कलंक लावू नका. गरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून मी गेल्या 14 महिन्यापांसून लढा देत आहे. संख्या बळ समाजाचंचं वाढवायचंय. असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. 

आरक्षणाला धक्का लागतोय बोलणारा कुठे आहे? 

तुम्ही आमच्यामध्ये येवू नका. आमच्यात मागणी करू नका. आधीच भरपूर आहेत. त्यामुळे तुम्ही या आरक्षणात येऊ नका. आमचं कमी होत आहे. तुम्ही काल परवा मोठ्या 17 जाती आरक्षणात घातल्या आहेत. आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणलेला कुठे आहे? आमच्यात येऊ नको म्हणलेला कुठं आहे. इतका द्वेष. तुम्हीच बोलला गोर गरीब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. कारण याच्यामध्ये भरपूर जण आहेत. आता त्या 17 जाती घातल्या तेव्हा तुम्ही ओबीसी समाजाचा विचार का केला नाही.