धक्कादायक! शिवसेना खासदार हरवले, त्यांच्या शोधासाठी लागलेत जागोजागी बॅनर

वाशीम - यवतमाळ मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेल्या खासदार हरवल्या आहेत. गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी मतदारसंघात जागोजागी बॅनर्स लावण्यात आलेत.

Updated: Mar 23, 2022, 01:07 PM IST
धक्कादायक! शिवसेना खासदार हरवले, त्यांच्या शोधासाठी लागलेत जागोजागी बॅनर title=

यवतमाळ : आपल्या मतदारसंघात खुल्या पद्धतीने त्या खासदार आपल्या कार्यकर्त्यांना भेटल्या. तो दिवस 27 सप्टेंबर 2021. त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसात त्या खासदारांना ईडीचे पहिले समन्स आले. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षप्रमुख यांनीही त्यांची भेट नाकारली. त्यानंतर त्या खासदार सार्वजनिक पटलावरुन अचानक दूर झाल्या आहेत.

1999 मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अनंतराव देशमुख यांचा पराभव करून वयाच्या 25 वर्षी त्या खासदार झाल्या. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक, 2009 मध्ये काँग्रेसचे हरिभाऊ राठोड ( मतदारसंघ पुनर्रचनेनंतर यवतमाळ आणि वाशिम हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला.) 2014 मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव मोघे तर 2019 मध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या दिग्गजांचा त्यांनी पराभव केला होता.

या दिग्गजांचा पराभव करणाऱ्या आणि सध्या हरवलेल्या त्या खासदार आहेत शिवसेनेच्या भावना गवळी. ईडीने चार वेळा त्यांना समन्स जारी केले. मात्र, अद्यापही त्या ईडीला सामोरे गेल्या नाहीत. पहिल्यांदा चिकन गुनिया, त्यानंतर संसदेचे सत्र अशी विविध कारणे देऊन त्यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले. त्यानंतर वाशिमसह अन्य ठिकाणी धाडी पडल्या. मुंबईतील त्यांच्या निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने अटक केली. 

निकटवर्तीय सईद खान यांच्या अटकेनंतर भावना गवळी यांनी सार्वजनिक कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्या आपल्या मतदारसंघातही फिरकल्या नाहीत. त्यामुळे आपल्या अडचणी मांडायच्या कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेने 'शिवसंपर्क' अभियान सुरु केलंय. या अभियानापासूनही भावना गवळी दूर राहिल्या आहेत. त्यामुळे भाजपने "आमच्या खासदारताई हरवल्या आहेत." खासदार दाखवा, बक्षीस मिळवा असे बॅनर्स यवतमाळ शहरात जागोजागी लावले आहेत.

या बॅनर्समध्ये एक कविताही लिहिण्यात आली असून या कवितेच्या माध्यमातून खासदारांना शोधण्याचं आवाहन भाजपनं नागरिकांना केलंय. तसेच, खासदारांना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याचंही भाजपनं जाहीर केलंय. 

आपण सुरु केलं शिवसंपर्क अभियान
या निमित्तानं आम्हा मिळेल का खासदारांच्या दर्शनाचा मान !!

एरव्ही त्यांचे आम्हास झाले दुर्लभ दर्शन
कंत्राटदार अन् कारखानदारीत रमले त्यांचे मन!

असे अभियान आपण बारमाही ध्याना!
अडीअडचणी आम्ही मांडायच्या कुणाकडे?

समजून घ्या आमची भावना !
युगपुरुष मोदीचे करण्या हात बळकट

आम्ही यांना दिला होता मतरूपी आशीर्वाद!
खासदार हरविल्या आमच्या कुठे मागायची आम्ही दाद