"शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता"; वर्धापनदिनीच 40 आमदारांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Shivsena 57th Foundation Day: "40 गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे," असा टोला ठाकरे गटाने सध्याच्या सरकारबद्दल भाष्य करताना लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 19, 2023, 10:48 AM IST
"शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता"; वर्धापनदिनीच 40 आमदारांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल title=
आज शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन आहे

Shivsena 57th Foundation Day: शिवसेना पक्षाच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त (Shivsena Foundation Day) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सत्ताधारी शिंदे गटावर (Eknath Shinde Group) निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. 'शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता,' असा टोला ठाकरे गटाने शिंदे गटातील 40 आमदारांना लागवला आहे. तसेच शिवसेनेनं अनेकदा फुटीचा सामना केला आहे. मात्र अशा फुटीरांना जनतेनच उत्तर दिलं आहे असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. कोणीही काहीही म्हटलं तरी शिवसेना 57 वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे, असा विश्वास या लेखात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे, असं म्हणत समर्थकांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आज वर्धापनदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाकडून वेगवगळ्या कार्यक्रमांचं मुंबईसहीत राज्यभरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे.

...पण सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार?

"शिवसेना 57 वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी सामना शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील 40 बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले. पुराण काळात प्रतिसृष्टी निर्माण झाली. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे गमतीजमती सुरूच असतात; पण सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार? चोरलेल्या आमदार, खासदारांचा आकडा म्हणजे वैचारिक बैठक नव्हे. शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय?" असा प्रश्न 'सामना'मधून शिंदे गटाला विचारण्यात आला आहे.

...तरी ही 40 पात्रे स्वतःच स्वतःला नाचवून घेत आहेत

"शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता. आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱ्यांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात. यांचे नेते मोदी आणि शहा, जे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पायाच उखडून टाकायला निघाले आहेत. तर हे प्रतिवालेही त्यांच्या प्रतिशिवसेनेचा म्हणे वर्धापन दिन साजरा करीत आहेत. अशा ‘प्रति’ मंडळांच्या मनगटात ना ताकद ना छातीत स्वाभिमानाचा हुंकार आणि जिद्द. सर्व खेळ पैशांचा. दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील. शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. 57 वर्षे ती घुमतच आहे. ही डरकाळी घुमू नये यासाठी आजवर का कमी प्रयत्न झाले? गद्दार लांडग्यांना वाघाचे कातडे पांघरून नकली वाघ बनविण्याचे प्रयोग महाराष्ट्रात अनेकदा झाले; पण ते सगळे प्रयोग मराठी माणसानेच बंद पाडले. ना प्रयोग चालले, ना त्याचे लेखक-दिग्दर्शक-नेपथ्यकार यांचे नामोनिशाण राहिले. आताही 40 गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे. जनतेने या प्रयोगाकडे पाठ फिरवली असली तरी ही 40 पात्रे स्वतःच स्वतःला नाचवून घेत आहेत," असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे.

शेवटी नकली ते नकली

"शेवटी ईडी सरकारच्या खाल्लेल्या मिठाला जागायला हवे. त्यासाठी ‘मिंधे’पणाचा आणि ‘गद्दारी’चा वर्धापन दिन साजरा करायलाच हवा. या उत्सवाची उचकी म्हणजेच डरकाळी असा आभास निर्माण करायला हवा. हा आभास म्हणजे उसने अवसान आहे हे महाराष्ट्रातील शेंबडे पोरदेखील सांगेल. ईडी सरकार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘उधारी’च्या मालावर या ‘मिंधे’ गटाची राजकीय दुकानदारी सुरू आहे. पुन्हा घटनातज्ञांपासून न्यायालयांपर्यंत सर्वांनी या ‘मिंधे’ वाघांना नकली आणि बेकायदा ठरवले आहे. त्यांचे वाघाचे कातडे ओरबाडून काढले आहे. मात्र राजकीय दुकानदारी सुरू ठेवायची तर ‘नक्कल’ करायलाच हवी, ‘साव’ बनून ‘आव’ आणायलाच हवा. मिंधे गटाची ही राजकीय मजबुरी आहे. त्या मजबुरीतूनच खऱ्या वाघाची नक्कल करण्याची, स्वतःला विचारांचे वारसदार वगैरे म्हणवून घेण्याची नौटंकी सुरू आहे. पण शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली!" असं अग्रलेखात म्हटलं आहे.

कितीही मांजरे आडवी येऊ द्या

"गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच! महाराष्ट्रातील जनता खुद्दार कोण आणि महाराष्ट्रधर्माच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण हे ओळखते. महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे ‘मिंधे’ वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी फोडतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील 57 वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. महाराष्ट्रात गेली 57 वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे आणि घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज माननिय बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. ओठात एक व पोटात भलतेच हा दांभिक कावा शिवसेनेस ठाऊक नाही. इथे सकाळी निष्ठsच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना 57 वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.