मालेगाव येथे अपघातानंतर रिक्षा-बस विहिरीत कोसळून ५ ठार

राज्य परिवहन मंडळाची बस आणि अपे रिक्षा अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळून पाच जण ठार झाले.

Updated: Jan 28, 2020, 05:47 PM IST
मालेगाव येथे अपघातानंतर रिक्षा-बस विहिरीत कोसळून ५ ठार title=

नाशिक : राज्य परिवहन मंडळाची बस आणि अपे रिक्षामध्ये यांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले तर २० ते २५  जण जखमी झाल्याची घटना मालेगाव - देवळा रोडवरील मेशी फाट्यानजीक धोबी घाट परिसरात घडली. ही बस कळवण आगाराची असल्याचे समजते. अपघातानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती.

नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. बस आणि रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी विहिरीत अडकले आहेत. तर बसमधील अनेक प्रवासी अडकलेत. काहींना बाहेर काढण्यात यश आले तरी अनेक प्रवासी विहिरीत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 

परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले. तर आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींवर मालेगांवच्या सामान्य रुग्णालय आणि देवळाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.