राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'

RBI withdraws ₹2000 note :  राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 20, 2023, 11:45 AM IST
राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात' title=

Raj Thackeray on RBI withdraws ₹2000 note : रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. (Raj Thackeray Nashik Visit) नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घेतले पाहिजे होते, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. 

भारतीय चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी मोठी घोषणा  8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8.30 वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानंतर या नोटा चलनातून बाद केल्या केल्यात. आता 2000 रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्याची घोषणा झाली आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता त्यात राज ठाकरे यांनी भर पडली आहे. त्यामुळे भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार याचीही उत्सुकता आहे.  

त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर भाष्य, 'मी देखील दर्ग्यात गेलोय'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तब्बल 20 महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये आलेत. दिवसभर बैठकांचं सत्र सुरु राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातला आढावाही घेत आहेत. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि  छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांच्या संघटनेच्या कामकाजाची ते माहिती घेणार आहेत. नाशिकमध्ये सध्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा वाद गाजत आहे. यावर त्यांनी भाष्य केले.

इतका कमकुवत होणारा धर्म आहे का?

हा तिथल्या लोकांचा प्रश्न आहे. इतर धर्मांचा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट होण्याइतका आपला धर्म कमकुवत आहे का? मी देखील अनेक दर्ग्यात गेलोय. तिथल्या लोकांनी हा निर्णय घ्यायचाय आहे. यात कुणाला दंगली हव्यात का?  गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे. चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाही. बहुसंख्य हिंदू राज्यात हिंदू खतरे मै है असं कसं होईल?, निवडणुका जवळ आल्या की हे सूचत, असे राज म्हणाले.

आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बैठका

आपण आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देणार आहे. आमचे  शाडो कॅबिनेट आहेच. नाशिकमध्ये आमच्या काळात जेवढी कामं झाली तेवढी कधीच नाही झाली. नाशिक दत्तक घेऊन काय केलं, हे तुम्ही त्यांना का नाही विचारत, असा सवाल करत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. त्याचवेळी  देशात सध्या इडी बिडीचे व्यवहार सुरु आहेत. उद्या दुसरं सरकार आलं तर ते आणखी जास्त वापर करतील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, त्यांनी एका राज्यावरुन देशाचं समीकरण बदलत नाही. बदलाची नांदी आहे का पहायचं आहे. तर कोकणातील बारसू प्रकरणी स्पष्ट भूमिका हवी. जमिनीच्या व्यवहारातून या गोष्टी होत आहेत. कमी भावात जमिनी घ्यायच्या, असे हे उद्योग आहेत.  जैतापूरचे काय झालं?
जैतापूरला का प्रकल्प होत नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.