पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला लागली, पतीने भर रस्त्यावर केली हत्या

Parbhani Crime News Today: परभणी जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थिनींवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

गजानन देशमुख | Updated: Jan 18, 2024, 01:03 PM IST
पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला लागली, पतीने भर रस्त्यावर केली हत्या title=
parbhani news eight standert Girl Stabbed To Death On Way To School

Parbhani Crime News Today: परभणी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान एका शाळकरी विद्यार्थिनींवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. जिंतुर तालुक्यातील बोरी गावातील ही घटना असून या जीवघेण्या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतकंच नव्हे तर, विद्यार्थिवींवर चाकुहल्ला करुन आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News Today) 

सदर तरुणी ही बोरी येथील संभाजी नगर येथे वास्तव्यास होती. बोरी येथील एका शाळेत नववीत शिकत होती. बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील वस्तीतून शाळेत जात असताना आरोपीने या विद्यार्थिनींला गाठून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तिला परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने आणि अति रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला झाल्याने आणि ते ही शाळेच्या परिसरात त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

विशेष बाब म्हणजे, तरुणीवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी हा हल्ला करून स्वतःहून बोरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यावेळी त्याने आपले या तरुणी बरोबर लग्न झालं असल्याचा दावा तो करत असल्याची माहिती आहे. त्याने ते दोघे पती -पत्नी असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तसंच, आम्ही दोघांनी यापूर्वी सोबत संसार केल्याचा हा दावा त्याने केला आहे. तसा एक फोटोही आरोपीने सादर केला आहे. पण त्याने तरुणीवर हल्ला का केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. रोहित गावायकवाड असं आरोपीचे नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 2021 मध्ये लॉकडाऊनमध्ये या दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पतीसोबत दोन वर्ष राहिल्यानंतर ती गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहण्यासाठी आली होती. पती मागील काही दिवसांपासून तिला सासरी येण्यासाठी आग्रह करत होता. पण ती सासरी जाण्यास तयार नव्हती. आज सकाळीच तिचा पती रोहित गायकवाड तिला भेटण्यासाठी आला होता. शाळेत जात असताना त्याने तिला गाठले त्यावेळी दोघांमध्ये वाद झाले. या वादातूनच त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले.