शेतकरी अडचणीत असताना नवी मुंबईच्या बाजारात पाकिस्तानची साखर

ही साखर येथील बाजार भावापेक्षा १ रुपयांनी कमी किमतीची आहे.

Updated: May 14, 2018, 11:24 AM IST

दीपक भातुसे, झी मीडिया, नवी मुंबई : यंदा आपल्या देशात आणि राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळे  इथले साखर कारखाने आणि ऊस पिकवणारे शेतकरी अडचणीत असतानाच पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात साखर आयात करण्यात आली आहे.  केंद्रातील मोदी सरकारच्या पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर उद्योग आणि ऊस शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडणार आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजार भावापेक्षा १ रुपयांनी कमी किमतीची आहे.

१०५ लाख मेट्रीक टन साखर शिल्लक

राज्यात सध्या १०५ लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील साखर मोठ्याप्रमाणात शिल्लक राहणार आहे. ही परिस्थिती असताना पाकिस्तानातून साखर आयात का करण्यात आली असा सवाल उपस्थित केला जातोय. आयात केलेली ही साखर सध्या नवी मुंबईच्या बाजारात तसंच ठाणे जिल्ह्यातील गोदामात आली आहे.