कॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना ठरवता येत नाही- नाना पटोले

 पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

Updated: May 26, 2020, 06:12 PM IST
कॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना ठरवता येत नाही- नाना पटोले  title=

नवी दिल्ली : राज्यपाल सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात परंतु कॅबिनेट बैठकमध्ये कोणते निर्णय घ्यावे हे राज्यपालांना ठरवता येत नसल्याचं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्याशिवाय पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचंही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

राज्यपाल सरकारवर नियंत्रण ठेवू शकतात पण कॅबिनेटमघ्ये कोणते निर्णय घ्यावे हे निर्देश देऊ शकत नाहीत. कोरोना आजार असताना राजकारण कोणी करू नये. फोडाफेडीचं राजकारण होणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना आमचं सरकार नाही म्हणजे ठाकरे सरकार आहे असं म्हणायचं असेल. केंद्राची जशी मोदी सरकार म्हणून ओळख आहे.

महाराष्ट्रात अलायन्समध्ये आहोत हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय. निर्णय प्रक्रीयेत काँग्रेसचा सहभाग असतो असेही पटोले यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील विधानसभेचे अधिवेशन जून महिन्यात होत आहे. या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचेही पटोले म्हणाले. 

सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले होते. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं. शरद पवारांनंतर नारायण राणे राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. राज्यपालांसोबतच्या भेटीदरम्यान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्रही सोडलं होतं. 

हे वाचा : केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती. पैसे कसे उभे करायला पाहिजेत आणि पोलीस यंत्रणा कशी हलवली पाहिजे यांचे ज्ञान या सरकारला नाही, नाचता येईना, अंगण वाकडे अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था असल्याचंही राणे म्हणाले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. पण महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातील या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्लीसाठी रवाना होत आहेत