मुंबईवर पाणीसंकट? धरणक्षेत्रात फक्त 23 टक्के पाणीसाठा

Monsoon News: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असून पाणीसाठा धीम्या गतीने वाढत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून फक्त 23 टक्के इतका पाणीसाठा आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 10, 2023, 08:01 AM IST
मुंबईवर पाणीसंकट? धरणक्षेत्रात फक्त 23 टक्के पाणीसाठा title=

Monsoon News: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असून पाणीसाठा धीम्या गतीने वाढत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून फक्त 23 टक्के इतका पाणीसाठा आहे. सध्या सातही धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पाहता मुंबईला पुढील दोन ते तीन महिने पुरेल इतके पाणी आहे. दरम्यान, पावसाळ्यानंतरही मुंबईची तहान भागवण्यासाठी ही धरणं पूर्ण क्षमतेने भरणं गरजेचं आहे. 

मुंबई आणि उपनगरात जितका पाऊस कोसळत आहे, तितका धरणक्षेत्रात होताना दिसत नाही. त्यामुळेच धरणांमधील पाणीसाठी धीम्या वेगाने वाढत आहे. मुंबई आणि धरणक्षेत्रात 50 मिमीच्या आत पावसाची नोंद होत आहे. 

सध्या धरणात असलेला पाणीसाठा मुंबईला पुढील दोन ते अडीच महिने पुरेल इतका आहे. पण मुंबईकांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करायचा असल्यास सातही धरणातील पाणीसाठा 14 लाख 47 हजार दशलक्षलीटरवर पोहोचण्याची गरज आहे. ऑक्टोबरपर्यंत सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. त्यामुळे पुढील तीन महिने धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची गरज आहे.   

Maharashtra Rain News : आज राज्याच्या 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; निसर्ग धडकी भरवणार

 

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातून मुंबईला दर दिवशी 3800 दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मुंबईला दररोज 2850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे धरणातील एक टक्का पाणी साधारण तीन दिवस पुरतं.
 
तलाव पूर्ण भरलेले असताना सातही तलावातील पाणीसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर इतका असतो. 

मुंबई शहर, पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद 

कोकण आणि गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज असून, यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबई शहर, पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता 

कोकण आणि गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. यंदा प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाल्याने त्याचा पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतरही पावसाला जोर असल्याचे दिसून आलेले नाही.

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, लातूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस पडला आहे, तर उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 

आज कोणकोणत्या भागांना अलर्ट? 

पुढच्या 24 तासांसाठी राज्यातील वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या भागांना यलो अलर्ट असेल. तर, तिथे कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट असेल.