'व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना....', रतन टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंचं मोदींना पत्र, भारतरत्न देण्याची मागणी

Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 10, 2024, 03:29 PM IST
'व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना....', रतन टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंचं मोदींना पत्र, भारतरत्न देण्याची मागणी title=

Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत. तसंच एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

"ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या 3 दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसंच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले आहेत, "काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक 2 मिनिटं स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासून सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे".

"तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे," अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.