'अबकी बार 225 पार', विधानसभा निवडणुकीबाबत पवारांचं भाकित

राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाकित व्यक्त केलं आहे. 

Updated: Jul 11, 2024, 07:30 PM IST
'अबकी बार 225 पार', विधानसभा निवडणुकीबाबत पवारांचं भाकित title=

Sharad Pawar on Assembly Elections seats : पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात राजकीय घडामोडींना देखील वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठं विधान केलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 225 जागा जिंकेल असं भाकित केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते देखील त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं चित्र बदलताना दिसत आहे. शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रात एक शक्ती उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून अनेक लोक पक्षात सहभागी होत आहेत. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हाती

लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. 5 वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे 6 खासदार निवडणूक आले होते. त्यामध्ये 4 राष्ट्रवादीचे होते. मात्र, गेल्या पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांच्या कामाचा जो अनुभव आला तो लोकांना चांगला वाटला नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.