'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...'

PM Modi Oath Ceremony : सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता राज्यातील कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद नाकारल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jun 9, 2024, 04:50 PM IST
'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...' title=
Devendra fadnavis Praful Patel

Devendra fadanvis On seat allocation : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ (Oath ceremony ) घेणार आहेत. यासाठी राजधानी दिल्लीत जोरदार तयारी सुरु आहे. सरकार स्थापनेसंदर्भात काल नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाहांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. आजच्या शपथविधीला कोण कोण शपथ घेणार याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल केलं होतं पण त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारलं असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले Devendra fadanvis?

मोदी सरकार मधील सर्व मंत्र्यांचं मी अभिनंदन करतो. रक्षा खडसे, मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासारखे तरूण खासदार मंत्रीमंडळात आहेत. प्रतापराव जाधवसारखे ज्येष्ठमंत्री असतील. त्यांचे अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राष्ट्रवादीला 1 जागा देण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल केलं होतं. पण ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही असं त्यांचे मत होते. पण भविष्यात त्यांचा विचार होईल, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

आमच्याकडून ॲाफर दिली होती. पण राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की पुढील वेळेस दिलं तरी चालेल. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ॲाफर दिली होती, असा खुलासा देखील फडणवीसांनी केला आहे. अजित पवार गटाने थेट मंत्रीपदाची ऑफर नाकारल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आले आहेत. भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नाराजी आता भाजप कशी दूर करणार? असा सवाल विचारला जातोय.