राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पाऊस, विजांच्या गडगडाटासह मुसळधार कोसळणार

Rain in Maharashtra : राज्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Updated: Oct 7, 2021, 01:54 PM IST
राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पाऊस, विजांच्या गडगडाटासह मुसळधार कोसळणार title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : Rain in Maharashtra : राज्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यावेळी विजांसह ढगांचा गडगडाट झाला. 

पुढचे चार दिवस राज्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे विजा चमकत असतील तर बाहेर पडू नका, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विजांच्या गडगडाटसह जोरदार पाऊस

दरम्यान, नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे परिसरात विजांच्या गडगडाटसह काल जोरदार पाऊस पडला. दिवसभर कडक ऊन यामुळे वातावरण तापले असताना, सायंकाळी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. तर औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी पाच जण नदीच्या पुरात बुडाले. यात 6 ते 15 वर्षे वयाच्या मुलांचा समावेश आहे. 

फुलंब्री तालुक्यता वाणेगावच्या गिरजा नदीपात्रात 3 जण बुडाले त्यात एकाला वाचवले तर 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. आजी सोबत ही मुलं नदी पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी खेळताना ते प्रवाहात पडले आणि दुर्दैवाने मृत्यू झाला. तर कन्नड शहरालगत पाझर तलावात एक आणि औरंगाबादेत खाम नदीपात्रात एक जण बुडाला.  

अंबरनाथ शहरात काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानाची संरक्षक भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन परिसरात ही घटना घडली. उद्यानाच्या संरक्षक भिंतीखालची माती खचली आणि भिंत बाजूलाच असलेल्या बैठ्या घरांवर  कोसळली. या घटनेत पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झाले असून काही गाड्यांचा दबल्याने चक्काचूर झाला.